नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षावर केला जाणारा घराणेशाहीचा आरोप खोडून काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की गेल्या तीस वर्षांपासून गांधी घराणे सत्तेपासून दूर राहिले आहे. या तीस वर्षात किमान पंधरा वर्षे कॉंग्रेसकडे सत्ता असूनही गांधी घराण्यातील माणूस पंतप्रधान झालेला नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप होत असला तरी आणि मी स्वता एका माजी पंतप्रधानांचा मुलगा असलो तरी मी तत्वासाठीची लढाई सोडून देणार नाही असेहीं त्यांनी स्पष्ट केले.
शिकागो विद्यापीठातील एक प्राध्यापक दिपेश चक्रवर्ती यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या चर्चेच्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आपल्याला सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असले तरी मी हे ट्रोलिंग मार्गदर्शन म्हणून घेतो त्यातून मला शिकता येते आणि भूमिका ठरवता येते असे ते म्हणाले. आपली आजी इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांनी देशाचे काहीं तरी वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे त्यांचा मला अभिमान आहे. त्यांच्यापासून मला मी नेमके काय केले पाहिजे याची प्रेरणा मिळते असेही त्यांनी या लाईव्ह चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
माझी तत्वांची लढाई सुरू आहे, दुसऱ्या तत्वांनी वागणाऱ्यांकडून माझ्यावर हल्ले होत आहेत. त्यातून मला अधिक सुधारणाच करता येते असेही त्यांनी नमूद केले.दीपेश चक्रवर्ती यांनी त्यांना कॉंग्रेस मध्ये गांधी घराण्याची घराणेशाही आणखी किती काळ चालणार अशा आशयाचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
माझ्या घराण्यातील शेवटचा माणूस पंतप्रधानपदावर बसून आता तीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे असेही राहुल गांधी यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले. राहुल गांधी यांचे वडिल राजीव गांधी हे 1984 ते 1989 या काळात देशाचे पंतप्रधान होते. युपीए सरकार सत्तेवर आले त्यावेळी माझ्या घराण्यातील कोणीही पंतप्रधानपद स्वीकारले नव्हते, तरीही माझ्यावर घराणेशाहीचा आरोप होत राहिला तरी मी माझी विचारसरणीसाठीची लढाई सोडणार नाही असेही त्यांनी या चर्चेत नमूद केले. यावेळी गांधी यांनी शिकागो विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्याही विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
कॉंग्रेस का हरली
यावेळी झालेल्या चर्चेत युपीए 2 नंतर कॉंग्रेस का हरली याचेही विश्लेषण राहुल गांधी यांनी केले. ते म्हणाले की,आम्ही या देशाला शतकातील पहिल्या भागात चांगली व्हीजन दिली, आम्ही हरितक्रांती केली, आम्ही आर्थिक उदारीकरण केले. सन 2004 नंतरही आम्ही एक विशिष्ट दृष्टीकोन ठेऊन राज्य केले. आम्ही देशाला वेगवेगळ्या टप्प्यात विकासाची वेगवेगळी व्हीजन दिली पण सन 2012 सालानंतर आम्ही नवीन व्हिजन देऊ शकलो नाही. त्यावेळीही देशासाठीची नवीन व्हिजन आम्ही देणे गरजेचे होते.
आमच्या सरकारकडून काही चुकाहीं झाल्या आणि सन 2008 साली देशाला जागतिक आर्थिक मंदीचा मोठा फटका बसला. या साऱ्या स्थितीचा कॉंग्रेसला फटका बसला. नरेंद्र मोदी देशासाठी नवीन व्हिजन घेऊन आले होते पण त्यांचे हे व्हिजन देशासाठी विनाशकारी ठरले. आता आमच्यापुढे देशासाठी नवीन व्हिजन आणून देशाला पुढे आणण्याचे काम करायचे आहे असे ते म्हणाले.