नवी दिल्ली – देशातील करोनाच्या प्रसाराबद्दल नागरीकांनी चिंता करण्याचे कारण नाही असे जे निवेदन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे त्याचा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी खरपुस समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की आरोग्यमंत्र्यांनी चिंता करू नका असे नागरीकांना सांगणे म्हणजे, टायटॅनिक या बुडत्या जहाजाच्या कॅप्टनने प्रवाशांना चिंता करू नका असे सांगण्यासारखे आहे.
करोनाच्या प्रसाराबद्दल सरकारने सर्व उपाययोजना केली असून त्या संबंधातील स्थिती नियंत्रणाखाली आहे असे हर्षवर्धन यांनी म्हटले होते. त्या संबंधात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने पुरेशा आर्थिक तरतूदीसह नेमकी काय उपाययोजना केली आहे याची माहिती लोकांना दिली पाहिजे.
देशातील करोनाग्रस्तांची संख्या आता 29 झाली असून शकडो संशयीत रूग्णांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे असेही सध्या सांगितले जात आहे.