मीरत (उत्तरप्रदेश) : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मीरत मध्ये प्रवेश करण्यापासून उत्तरप्रदेश पोलिसांनी आज रोखले. हे नेते नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील निदर्शनांच्यावेळी पोलिस गोळीबारात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तिकडे गेले होते. आम्हाला केवळ त्यांच्या कुटुंबियांना भेटायचे आहे, त्यासाठी अनुमती द्या अशी विनंती राहुल गांधी आणि प्रियांकांनी पोलिसांना केली होती पण पोलिसांनी ती अमान्य करीत त्यांना तेथून परत पाठवले.
त्या दोन्ही नेत्यांना प्रतापपुर पोलिस ठाण्याजवळच अडवण्यात आले. व त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. आम्हाला अडवण्याचा सरकारचा आदेश असेल तर तो दाखवा आम्ही पोलिसांना सांगितले पण पोलिसांनी तो आदेश दाखवला नाही अशी तक्रार राहुल गांधी यांनी केली.
निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात किमान पाच निदर्शक एकट्या मीरत मध्ये ठार झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हे नेते तिकडे निघाले होते.उत्तरप्रदेशात या हिंसाचारात एकूण किमान सतरा जण ठार झाले आहेत. या आधी तृणमुल कॉंग्रेसचे शिष्टमंडळही या मृतांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आले होते पण त्यांना लखनौ विमानतळावरच अडवण्यात आले होते.