नवी दिल्ली – चौकीदार चोर हेै हे वाक्य कोर्टाच्या तोंडी घातल्याच्या प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कोर्टाच्या सुचनेनुसार बिनशर्थ माफी सादर केली आहे. या माफी पत्रानुसार आता भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांनी दाखल केलेला खटला रद्द करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी या अर्जात केली आहे. आपल्या तीन पानी प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांनी आपला न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आणि सन्मान असल्याचे नमूद केले आहे.
राहुल गांधी यांनी चोैकीदार चोर हे वाक्य कोर्टाच्या तोंडी घातल्याने त्यांच्या त्या विधानावर मिनाक्षी लेखी यांनी आक्षेप घेतला होता. राफेल प्रकरणात नव्याने सादर झालेले पुरावे रेकॉर्डवर घेण्याचा आदेश कोर्टाने अलिकडेच दिला होता त्यावर प्रतिक्रीया देताना, आता कोर्टानेही चौकीदार चोर आहे हे मान्य केले असल्याची प्रतिकीया दिली होती. पण कोर्टाने आपल्या निकाल पत्रात असे कोणतेच वाक्य म्हटलेले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांना एकतर आपल्या विधानाचे समर्थन करा किंवा माफी मागा अशी सुचना त्यांना केली होती त्यानुसार त्यांनी आज ही बिनशर्थ माफी सादर केली. चौकीदार चोर है ही त्यांची व्यक्तिगत घोषणा आहे ती त्यांनी कोर्टाच्या तोंडी घालून राहुल गांधी यांनी कोर्टाचा अवमान केला आहे असा मिनाक्षी लेखी यांचा आक्षेप होता.