सुरक्षेसाठी कॉंग्रेसकडून गृहमंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा आज कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला. राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. बुधवारी राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते पत्रकारांशी वार्तालाप करत होते. तेंव्हा त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर लेसर प्रकाशकिरण पडल्याचे अढळले होते. त्यांच्या आणखी 7 वेळी राहुल गांधी यांच्यावर लेसर प्रकाश किरण पडल्याचे आढळून आले होते, असे कॉंग्रेस पक्षाकडून राजनाथ सिंह यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर अहमद पटेल, जयराम रमेश आणि रणदीप सिंह सुर्जेवाला या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे लेसर प्रकाश किरण हे “लेसर गन’चे असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि राहुल गांधी यांना संरक्षण देण्यात यावे, असेही या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान राहल गांधी यांच्या चेहऱ्यावर पडलेले लेसर किरण हे लेसर गनचे नसून कॉंग्रेसच्याच एका छायाचित्रकाराच्या मोबाईलमुळे पडलेले होते, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.