सूरत : फौजदारी मानहानी प्रकरणातील सुनावणीसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी येथे दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. गेले काही दिवस परदेशात असलेले राहुल गांधी यांनी या खटल्याच्या सुनावणीला व्यक्तीशः उपस्थित न राहण्याची सवलत मिळवली होती. मत्र आजच्या सुनावणीसाठी त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान “सर्व चोरांना मोदी आडनाव कसे?’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यविरोधात भाजपचे पश्चिम सूरतमधील आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एच. कपाडिया यांनी “आरोप मान्य आहे का?’ असे विचारले असता राहुल गांधी यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले.
राहुल गांधींचा जबाब नोंदविल्यानंतर त्यांच्या वकीलांनी वैयक्तिक हजर राहण्यापासून कायमची सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. त्यावर मोदींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. या अर्जावर 10 डिसेंबर रोजी निर्णय घेतला जाईल, असे कोर्टाने सांगितले.
राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केल्याचा आरोप आमदार पूर्णेश मोदी यांनी केलेल्या तक्रारीत केला होता. राहुल गांधींविरोधात बदनामीचा फौजदारी दावा कोर्टाने सकृतदर्शनी मान्य केला आहे. “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी … मोदींना सर्व सामान्य आडनाव कसे आले? सर्व चोरांना मोदी आडनाव कसे?’ असे गांधी म्हणाले होते.