अमेठी – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी 6 मे रोजी होत आहे. याआधी राहुल गांधींनी अमेठीवासीयांना एक पत्र लिहिले आहे. अमेठीचे नागरिक आपल्या कुटुंबातील असल्याचे सांगत राहुल यांनी या पत्रात भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
राहुल लिहितात, अमेठीशी माझे नाते भावनात्मक पातळीवर तितकेच बळकट आहे, जितके ते कुटुंबातील सदस्यांसोबत असते. भाजपला असत्य आणि पैशांच्या आधारे निवडणुका जिंकायच्या आहेत, असा आरोप राहुल यांनी केला आहे.
अमेठी माझे कुटुंब आहे. माझे हे कुटुंब मला सत्यासाठी लढण्याची हिंमत देते, गरिबाचे दुःख ऐकण्याची, त्यांच्यासाठी आवाज उठवण्याची, सर्वांसाठी समान न्यायाचा संकल्प करण्याची हिंमत देते. तुम्ही मला जी प्रेमाची शिकवण दिली होती, त्याआधारे मी देशाला उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जोडण्याचा प्रयत्न केला आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. या निवडणुकात भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशासह पूर्ण भारतात हारणार असल्याचा दावा त्यांनी केला.