जम्मू – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची चमक आगामी काळात दिसेल. पुढील लोकसभा निवडणुकीत ते भाजपसाठी मोठे आव्हान ठरतील. राहुल यांचे नेतृत्व देशात चमत्कार घडवेल, असे भाकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी केले.
राहुल यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत शुक्रवारी राऊत सहभागी झाले. त्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राहुल यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. राहुल यांच्यात देशाचे पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राऊत यांनी होकारार्थी उत्तर दिले. भाजपने राहुल यांची चुकीची प्रतिमा उभी केली.
यात्रेने ती पुसून टाकली. कन्याकुमारी ते काश्मीर हे 3 हजार 500 किलोमीटरचे अंतर प्रत्येकजण पायी चालू शकत नाही. त्यासाठी मोठ्या निश्चयाची आणि देशप्रेमाची गरज आहे. राहुल यांच्या यात्रेत मला कुठेही राजकारण दिसले नाही. स्वत: राहुल पंतप्रधानपदाची आकांक्षा नसल्याचे नमूद करतात. मात्र, राहुल यांना त्या पदावर पाहण्याची जनतेचीच इच्छा असेल तर त्यांच्यापुढे पर्याय उरणार नाही, असे त्यांनी म्हटले.
राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेसविना तिसरी आघाडी उभी राहण्याची कल्पना राऊत यांनी धुडकावली. देशाच्या प्रत्येक भागात कॉंग्रेसचे अस्तित्व आहे. त्या पक्षाविना कुठलीच आघाडी यशस्वी ठरणार नाही हे वास्तव स्वीकारायला हवे. सध्या कॉंग्रेसचे कमी खासदार आहेत. मात्र, पुढील निवडणुकीत ती स्थिती बदलेल, असा दावाही त्यांनी केला.