लखनौ – लोकसभा निवडणुकीतील पराभवाने राहुल गांधी व्यथित असून अमेठीतील पराभवाने ते अधिक िंचंतीत झाले आहेत असे उत्तरप्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष राज बब्बर यांनी म्हटले आहे. निवडणूक निकालानंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत राज बब्बर यांनी म्हटले आहे की राहुल यांनी अमेठीला कायमच महत्व दिले आहे. त्यांच्यासाठी अमेठी हा केवळ एक लोकसभा मतदार संघ नव्हता तर ते त्यांच्यासाठी एक कुटुंब होते. आपल्याच कुटुंबियांकडून आपल्यावर अशी वेळ आणली जाईल असे त्यांनी मनातही आणले नसावे.
बब्बर म्हणाले की वायनाड मधून ते जरी खासदार झाले असले तरी अमेठीतून आपण जिंकू शकलो नाही याचे शल्य त्यांच्या मनात कायम राहील असे मला वाटते. कॉंग्रेसने उत्तरप्रदेशच्या राजकारणात प्रियांका गांधी यांना उतरवले पण त्याही अपेक्षित परिणाम साधू शकल्या नाहीत त्या विषयी विचारले असता बब्बर म्हणाले की त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले पण त्याचा लाभ उठवण्यास पक्षाचे स्थानिक नेते कमी पडले असे आपले निरीक्षण आहे.
राहुूल गांधी आणि प्रियांका यांनी पक्षासाठी अतोनात कष्ट घेतले. पण पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवार त्याचे यशात रूपांतर करण्यात अपयशी ठरले असे ते म्हणाले. आम्ही कमी पडलो. आम्हा पक्ष कार्यकर्त्यांना अपयश आले त्यामुळे या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडता येणार नाही असे मतही त्यांनी यावेळी नोंदवले.
उत्तरप्रदेशात पक्षाचा इतका दारूण पराभव का झाला त्याचे एका ओळीत उत्तर देता येणार नाही. प्रथम आम्हाला आमचा पराभव मान्य करावा लागेल. आणि मी एकटा पराभवाची कारणमिमांसा करू शकणार नाहीं. आम्हाला एकत्र बसून ही कारणे शोधावी लागतील असे ते म्हणाले.