स्मृती इराणीं याची उपरोधिक टिका
जिथे जिथे प्रचार करतात तेथे तेथे कॉंग्रेसचा पराभव
मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी जिथे जिथे प्रचार करतात तेथे तेथे कॉंग्रेस पक्षाचा पराभव होतो. ते कॉंग्रेससाठी संकटच ठरत आहेत, अशी उपरोधिक टिका, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केली. काश्मिरची चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांना ब्रिटनला का गेले?, वीर सावरकरांचा अपमान का केला, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांची भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली. यावेळी महाराष्ट्र भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रवक्ते गणेश हाके आदी उपस्थित होते.
कॉंग्रेस नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आजवर जिथे जिथे प्रचार केला, तिथे तिथे कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाला आहे. ज्यांचा अमेठीत पराभव झाला. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. राहुल गांधी हेच स्वत:च्या पक्षासाठी संकट ठरत आहेत, असे त्या म्हणाल्या.
स्मृती इराणी यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचे कौतूक करत राज्य सरकारने मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना केवळ 4 हजार कोटींची कर्जमाफी दिली. मात्र, फडणवीस सरकारने 25 हजार कोटींची कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी आघाडी सरकारच्या काळात केवळ 7670 कोटींची भरपाई मिळाली, तर फडणवीस सरकारच्या काळात 21 हजार 950 कोटी रुपयांची भरपाई दिली गेली. मागील पाच वर्षात फडणवीस सरकारने शेती क्षेत्रात तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक केली. तर कॉंग्रेस सरकारच्या 15 वर्षाच्या कालखंडात केवळ 60 हजार कोटींची गुंतवणूक केली होती, याकडेही इराणी यांनी लक्ष वेधले.