अमेठी – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या अमेठीमध्येच काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा अमेठीमध्ये ५२हजार मतांनी दारुण पराभव केला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच अमेठी दौऱ्यावर असून आज त्यांनी गौरीगंज येथे पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
काँग्रेसचे तिलोई विधानसभा प्रभारी माता प्रसाद वैश यांच्या कुटुंबीयाचे निधन झाल्याने आज राहुल गांधी यांनी त्यांच्या निवास्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.
दरम्यान, आपल्या अमेठी दौऱ्यामध्ये राहुल गांधी अमेठी लोकसभा मतसंघामध्ये समावेश असलेल्या सलोन, अमेठी, गौरीगंज, जगदीशपूर आणि तिलोई या पाच विधानसभा मतदारसंघातील स्थानिक काँग्रेस नेत्यांची व बूथ कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.