नवी दिल्ली – देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून यासाठीची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार पाच पैकी तीन राज्यांमध्ये भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताच्या दिशेने सुरु आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे.
निवडणूक कलांमधून काँग्रेस पक्षाला सर्वच राज्यांमध्ये मोठा फटका बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमधील पराभव मान्य केला आहे.
निवडणूक निकालांबाबत राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक संदेश पोस्ट केला आहे. राहुल गांधी लिहतात, “आम्ही जनादेशाचा स्वीकार करतो. ज्यांच्या पारड्यात जनमत पडले आहे त्यांचे अभिनंदन. निवडणुकांमध्ये पक्षासाठी मेहनत घेतलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपण यातून बोध घेऊन पुढे जाऊयात व लोककल्याणासाठी काम करत राहुयात.”
दरम्यान, पंजाबमध्ये सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. येथे पक्षाचे मुख्यमंत्री चरंजीत सिंह चन्नी व पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पराभव पत्करावा लागला आहे. चन्नी यांनी दोन मतदारसंघातून निवडून लढवली होती मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
“Humbly accept the people’s verdict,” says Congress leader Rahul Gandhi after the party loses all five states #AssemblyElections2022 pic.twitter.com/hKBLWM47kw
— ANI (@ANI) March 10, 2022