नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातल्या कोळसा संकटाविषयी केंद्र सरकारवर टीका केल्यामुळे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे, त्यांच्यावर चांगलेच भडकलेले दिसले. राहुल गांधी हे सध्या बनावट ज्योतिषी बनले आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
सध्याच्या कोळसा टंचाईवर भाष्य करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी त्यांच्या सरकारच्या काळात झालेला कोळसा घोटाळा आठवावा आणि त्यातून देशाचे किती नुकसान झाले होते याची माहिती घ्यावी असा सल्लाही प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. सध्या कोळसा मंत्रालयाचा कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे आहे.
राहुल गांधी यांनी अलिकडेच म्हटले होते की मोदी सरकारने देशात “द्वेषाचा बुलडोझर” चालवणे थांबवावे आणि त्याऐवजी बंद पडत चाललेले पॉवर प्लांट सुरू करण्याचा प्रयत्न करावा. त्यावर प्रल्हाद जोशी यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
कोळशा अभावी देशात कसे संकट उभे राहिले आहे याचा तपशील राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर दिला होता. या संकटामुळे छोटे उद्योग उध्वस्त होणार आहेत, त्यामुळे बेरोजगारी आणखी वाढणार आहे. देशातील युवापिढी हा बेरोजगारीचे आघात आणखी सहन करू शकणार नाही.
कोळशा अभावी वीज बंद पडली तर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद पडण्याचा धोका आहे याची जाणिवही राहुल गांधी यांनी करून दिली होती. त्यामुळे जोशींचा मात्र चांगलाच जळफळाट झाला. त्यांनी देशात उत्पादीत होणाऱ्या कोळशाची आकडेवारी फेसबुक पोस्टवर टाकली. पण आज अनेक ठिकाणी जी कोळसा टंचाई निर्माण झाली आहे त्यावर मात्र त्यांनी नेमकेपणाने भाष्य केलेले नाही.
जोशी यांनी म्हटले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचे कोळसा उत्पादन 777 मेट्रिक टन इतके झाले आहे आणि देशात 818 मेट्रिक टन एवढा कोळसा साठा झाला आहे. कॉंग्रेसच्या काळापेक्षा हे कोळसा उत्पादन जास्त आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांना हे आकडे समजत नाहीत कारण ते अज्ञानी आहेत अशी टिप्पणीही जोशींनी केली आहे.
एवढे बोलूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी म्हटले आहे की देशाच्या भविष्याविषयी भाष्य करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाचे भविष्य त्यांनी सांगावे. त्यांना भविष्य सांगण्याची फारच हौस दिसते आहे असेही जोशींनी म्हटले आहे. देशात वीज कंपन्यांकडे सध्या दहा दिवस पुरेल इतका साठा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.