नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे संकटमोचक प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून अनेकांनी त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील प्रणवदा यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून, “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी देशवासियांना मिळाली. संपूर्ण देशवासीयांसोबत त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराप्रति संवेदना.” असं ट्विट केलं.
With great sadness, the nation receives the news of the unfortunate demise of our former President Shri Pranab Mukherjee.
I join the country in paying homage to him.
My deepest condolences to the bereaved family and friends. pic.twitter.com/zyouvsmb3V
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 31, 2020
तत्पूर्वी, घरी घसरून पडल्याने प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूला इजा झाली होती. त्याची तपासणी सुरु असतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाली. ते शस्त्रक्रियेनंतर कोमात गेले. त्यातून ते बाहेर आलेच नाहीत.
गेली सहा दशके राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या प्रणवदांना राष्ट्रीय राजकारणात इंदिरा गांधी यांनी आणले. तब्ब्ल पाच वेळा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे प्रणवदा अखेरपर्यंत या पदापासून दूर राहिले. त्यांची राष्ट्रपती पदावर निवड करून काँग्रेसने त्यांचा अखेरच्या काळात सन्मान राखला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ते पहिले माजी राष्ट्रपती ठरले.
इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर आलेल्या पुलोद सरकारने त्यांच्यावर अधिकार एकवटून त्याचा गैरवापर करण्याचा आरोप ठेवला. हा राजकीय आरोप वगळता प्रणवदांची ६० वर्षांची राजकीय कारकीर्द अखेरपर्यंत निष्कलंक राहिली.
काँग्रेस सरकारच्या अनेक पेचप्रसंगात त्यांचा मुस्तद्दीपणा कामी आला. संपुआ सरकारने अमेरिकेशी केलेला अणुकरार, डाव्यांच्या विरोधामुळे अडचणीत आला होता. त्यावेळी मुखर्जी यांनी डाव्यांशी चर्चा करून मुत्सद्दीपणे त्यातूंमार्ग काढला.
देशात उदारीकरणाचे पर्व सुरु करण्यात त्यांचा नियोजन आयोगाचे अध्यक्ष म्हणून महत्वपूर्ण सहभाग होता. इंदिरा गांधी यांचे वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणवदांचे राजीव गांधी यांच्याशी फार सख्य राहिले नाही. मात्र, सोनिया गांधी यांचा राजकारणातील प्रवेश त्यांनीच घडवून आणला.