नवी दिल्ली : देशात गलवान खोऱ्यातील संघर्षावरून भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. सीमेवरील संघर्षानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत. राहुल गांधींकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी ते सर्व करत आहेत, जे जबाबदार विरोधी पक्षाच्या नेत्यानं करायला नको,” असे म्हणत नड्डा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi does not attend a single meeting of Standing Committee on Defence. But sadly, he continues to demoralise the nation, question the valour of our armed forces and do everything that a responsible opposition leader should not do.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) July 6, 2020
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध पूर्णपणे बिघडले असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सरकारवर टीका करत आहे. राहुल गांधी यांच्या टीकेचा भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी समाचार घेतला. नड्डा यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना लक्ष्य केले. “राहुल गांधी संसदेच्या संरक्षण स्थायी समितीच्या एकाही बैठकीत सहभागी झाले नाहीत. मात्र, वेदनादायी गोष्ट ही आहे की, ते सातत्यानं देशाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर लष्कराच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल गांधी ते सगळ करत आहेत, जे एका जबाबदार विरोक्षी पक्षनेत्यानं करायला नको,” अशी टीका नड्डा यांनी केली आहे.
Rahul Gandhi belongs to that glorious dynastic tradition where as far as defence is concerned, committees don’t matter, only commissions do.
Congress has many deserving members who understand parliamentary matters but one dynasty will never let such leaders grow. Really sad.— Jagat Prakash Nadda (@JPNadda) July 6, 2020
राहुल गांधी अशा वंशपरंपरेतून येतात, जिथे संरक्षणा संबंधित समित्यांचं काही स्थान नाही. फक्त आयोग चालतात. काँग्रेसमध्ये असे अनेक पात्रता असलेले नेते आहेत, ज्यांना संसदीय विषयांचं महत्त्व माहिती आहे, पण एक घराणे अशा नेत्यांना मोठं होऊ देणार नाही. हे खरोखर दुःखद आहे, असा हल्लाबोल नड्डा यांनी ट्विट करून काँग्रेसवर केला. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरून आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर ते आक्रमकपणे प्रश्न विचारताना दिसले. त्याचाच समाचार भाजपकडून घेण्यात आला आहे.