नवी दिल्ली : संसदेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी आज काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मोदी-अदानी संबंधांवर प्रश्न विचारले. याशिवाय त्यांनी संसदेतील भाषणही काढून टाकल्याची चर्चा आहे.
राहुल गांधींनी आज पत्रकार परिषदेची सुरुवातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत केली. त्यांनी ‘माझ्या पुढच्या भाषणाच्या भीतीने आपल्याला अपात्र असल्याचे ठरवलं आहे असे म्हणत, यापुढेही आपण असेच प्रश्न विचारत राहणार आणि अदानींचा मोदीजींशी काय संबंध?’ या माझ्या प्रश्नाचे त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. तसेच आपल्याला मोदींच्या डोळ्यात भीती दिसली होती ते आपल्या आगामी भाषणामुळे घाबरले होते त्यामुळे त्यांनी ही कारवाई केली असल्याचे म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी, मी कधीच देशाविरोधात बोललो नाही. माझ्या भारत जोडो यात्रेचे कोणतेही भाषण पहा, सर्व समाज एक आहे असे मी नेहमीच म्हणत आलो आहे. द्वेष, हिंसा होऊ नये. भाजप लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम करते, कधी ओबीसींबद्दल बोलते, तर कधी परदेशाबद्दल बोलते. मी या लोकांना घाबरत नाही. माझे सदस्यत्व रद्द करून, धमक्या देऊन, तुरुंगात पाठवून ते माझे तोंड बंद करू शकतात, असे त्यांना वाटत असेल, तर तसे होणार नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन. असे म्हटले आहे.
भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी अनेकदा सांगितले आहे. याची रोज नवी उदाहरणे मिळत आहेत… मी संसदेत पुरावे दिले. मी संसदेत असो की बाहेर याने मला काही फरक पडत नाही. मला माझी तपश्चर्या करायची आहे, ते करून दाखवीन. सत्य माझ्या रक्तात आहे. तुम्ही काहीही करा, मी प्रश्न विचारत राहीन. तुम्ही मला आजीवन तुरुंगात पाठवा किंवा आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घाला., पण मी माझं काम करत राहीन असं म्हटलं आहे.