कोलकाता – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पश्चिम बंगालमधील निवडणुकीबाबत त्या राज्यातील कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली. या राज्यातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी आघाडी करण्याचा मनोदय या आधीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
परंतु त्या विषयीचा अंतिम निर्णय अजून जाहीर झालेला नाही. त्या संबंधात राहुल यांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी व अन्य डाव्या पक्षांशी आघाडी करण्याचा प्रस्ताव योग्य असल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे पण जागावाटपाबाबत त्यांच्यात अजून एकवाक्यता निर्माण झालेली नाही. राहुल गांधी यांनी या संबंधी कॉंग्रेस नेत्यांची मते ऐकून घेतली.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. सन 2016 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने पश्चिम बंगालमध्ये 96 जागा लढवल्या होत्या. पण यावेळी बिहारचा अनुभव लक्षात घेऊन जिथे पक्षाची ताकद आहे त्या जागांवरच लक्ष केंद्रित करण्याची सूचना काही कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी कॉंग्रेस व डाव्या पक्षांची आघाडी होऊ शकली नव्हती.
त्यामुळे त्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसला. त्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एकही जागा मिळाली नाही. कॉंग्रेसला मात्र दोन जागा पदरात पाडून घेता आल्या होत्या. कॉंग्रेस व डाव्या पक्षांची आघाडी तृणमूल व भाजपला उत्तम पर्याय ठरू शकेल, असे अनेक कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.