नवी दिल्ली – केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार हे केवळ बोलण्याच्या कामाचे आहे. ते केवळ गरीबांचे अधिकार चिरडण्याचेच काम करत आहेत, अशी तोफ कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा डागली आहे.
अगोदर या सरकारने लॉकडाउनचा तुघलकी निर्णय घेतला आणि लाखो कामगारांना रस्त्यावर आणले. या कामगारांना केवळ मनरेगाचा सहारा होता. त्यातून मिळालेले पैसेही त्यांना आता बॅंकांमधून काढणे अवघड बनले असल्याचा दावा राहुल यांनी केला.
आपल्या आरोपांच्या पुर्ष्ट्थ एका बातमीचा हवाल देत राहुल गांधी यांनी ट्वीटही केले आहे. मजुरांना आपले मानधन काढण्यासही आता बॅंकांचे हेलपाटे मारावे लागत असल्याचा दावा त्या बातमीत एका सर्वेक्षणाच्या हवाल्याने करण्यात आला होता. 202 रूपये रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना धक्के खावे लागत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणानुसार मनरेगाच्या 45 टक्के मजुरांना आपल्या वेतनासाठी संघर्ष करावा लागतो आहे. बायोमेट्रीक डिटेल्स मॅच होत नसल्यामुळे बॅंका अथवा टपाल कार्यालय मजुरांची रिकाम्या हाताने बोळवण करत असून हा भयंकर प्रकार असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. आपलीच मजुरी मिळवण्याच्या नादात मजुरांना खिशातला पैसा खर्च करावा लागत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या सगळ्याचा संदर्भ देत राहुल म्हणाले की आज देशातील बॅंका अडचणीत आहेत अन देशाचा जीडीपीही. आपल्याकडे एवढी महागाई आणि बेरोजगारी यापूर्वी कधीच नव्हती. सामाजिक न्यायाची दररोज अवहेलना केली जात असून जनतेचे मनोधैर्यही आता संपले असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.