नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून काँग्रेसची होणारी पडझड पाहता काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे अनेकांनी म्हटले होते. मात्र त्यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाची भूमिका खास करून तेलंगणामध्ये काय असेल यावर स्पष्टपणे मांडली आहे. राहुल गांधी यांनी टीआरएससोबत काँग्रेसची कोणतीही युती होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी तेलंगणातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीसोबत युतीची कोणतीही शक्यता नाकारली आहे. यावेळी बोलताना त्यांनी टीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि ते मुख्यमंत्री नसून लोकांचा आवाज न ऐकणारा राजा असल्याची घणाघाती टीकादेखील यावेळी त्यांनी केली.
‘रयथू संघर्ष सभेला’ संबोधित करताना शेतकऱ्यांसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन राहुल गांधींनी केले. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमत देऊ, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहु गांधी यांनी पक्षाची वारंगल घोषणा देखील जारी केली. ज्यात शेतकरी कर्जमाफी दिली जाईल. तसेच टीआरएस सरकारकडून दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपयांच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रति एकर १५ हजार रुपये वाढीव नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच MSP वर सर्व पिकांची खरेदी करण्याचे आणि सर्व साखर कारखाने सुरू करण्याचे आश्वासन दिले.
“आज असं म्हटलं जातं की तेलंगणात मुख्यमंत्री आहे, पण खरं तर तो मुख्यमंत्री नसून ‘राजा’ आहे, जो लोकांचा आवाज ऐकत नाही तर फक्त स्वतःचं ऐकतो. कोणताही मुख्यमंत्री लोकांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतो पण राजाला लोकशाहीशी काही देणेघेणे नसते आणि त्याला जे वाटते तेच करतो,” असे म्हणत राहुल गांधींनी केसीआर यांच्यावर टीका केली. पुढे जाऊन काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीसोबत (टीआरएस) कोणतीही युती करणार नाही आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि केसीआर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष यांच्यात थेट लढत होईल, असे राहुल गांधी म्हणाले.