नवी दिल्ली – चीनने भारतावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, पण सरकार गाढ झोपले होते. त्यामुळेच आपले सैनिक तेथे नाहक शहीद झाले, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. चीनच्या हल्ल्याच्या संबंधात संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या वक्तव्याचे टिप्पणही राहुल गांधी यांनी आपल्या म्हणण्याच्या प्रीत्यर्थ सादर केले आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता, असे श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.
आज सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुन्हा सरकारवर चीन विषयावरून हा निशाणा साधला. चीन सीमेवरील स्थितीबाबत सरकार माहिती लपवत आहे, असा दावाही ते गेले काही दिवस सतत करीत आहेत. सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन तेथील स्थितीबाबत लोकांना माहिती दिली पाहिजे, आम्ही पूर्णपणे सरकारबरोबर आहोत. त्यामुळे सरकारने घाबरण्याचे कारण नाही, असेही राहुल गांधी सांगत आले आहेत.