नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज तिथं जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आज लखीमपूरला जाण्याची परवानगी मागितली होती. पण योगी सरकारने त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप झाल्यानंतर लखीमपूरमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर तिथं कलम 144 लागू करण्यात आले आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांना लखीमपूरला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही वाटेतच रोखून त्यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज लखीमपूर खेरीला भेट देण्याची शक्यता आहे. या संदर्भात, काँग्रेसनं उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे की, ज्याप्रमाणे टीएमसी नेत्यांना लखीमपूर खेरी घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे काँग्रेस नेत्यांना परवानगी द्यावी. राहुल गांधी अशावेळी लखीमपूर खेरीला भेट देण्याचा विचार करत आहे, जेव्हा त्यांची बहीण प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात आहे.
प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यापासून राहुल गांधी सतत प्रियांका गांधी यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी ट्वीट केले आणि म्हटलं की, “ज्यांना ताब्यात घेतलंय ती घाबरत नाही, खरी काँग्रेसी आहे. हार मानणार नाही! सत्याग्रह थांबणार नाही.
#FarmersProtest” राहुल गांधी यांनी सोमवारी ट्वीट करत म्हटले होते, की “प्रियंका, मला माहीत आहे की, तू मागे हटणार नाहीस, ते तुझ्या धाडसाला घाबरतात. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू #NoFear #लखीमपुर_किसान_नरसंहार”