नवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोना संकटात सापडल्याने लोक अक्षरश: काकुळतीला आले आहेत. संकटाच्या या काळात विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचले आहे.
यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनो सर्व राजकीय कामं सोडा आणि जनतेला मदत करा. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. काँग्रेसचा हाच धर्म आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी हे सातत्याने ट्विटरवरून केंद्र सरकारला सल्ले देतानाच केंद्राच्या कारभारावरही ताशेरे ओढत आहेत. त्यांनी नुकतंच एक ट्विट करून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. केंद्र सरकारने पीआर आणि अनावश्यक प्रकल्पांवर खर्च करण्या ऐवजीत व्हॅक्सिन आणि ऑक्सिजन व इतर सेवांकडे लक्ष द्यावे. हे आमचे नम्र आवाहन आहे.
येणाऱ्या काळात हे संकट अधिक गंभीर रुप धारण करणार आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी देशाने सज्ज राहिलं पाहिजे. सध्याची परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे, असं राहुल म्हणाले होते.