नवी दिल्ली:राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर, अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. यावर भाजपने आक्षेप घेतला होता. त्यानंतर कोर्टाने राहुल गांधींना खुलासा मागितला होता.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना मी १० एप्रिल रोजी राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल वाचला नव्हता. कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता,असे त्यांनी प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे.
मी निवडणुकीच्या वातावरणात जोशात विधान केले होते आणि माझ्या राजकीय विरोधकांनी त्या विधानाचा विपर्यास करत गैरसमज पसरवले. ‘राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाने चौकीदार चोर है’, असा विधान केल्याचे विरोधकांनी पसरवले होते. मी असा विचार कधी केलाही नव्हता, असेही ते म्हणाले.