नवी दिल्ली : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यात इतर पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला आहे. हे करत असताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दोन्ही नेत्यांनी केरळमध्ये आपल्या रॅलीदरम्यान डाव्या सरकारवर टीका केली होती.
“वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र समान आहे. याबाबीत त्यांचं एकमत आहे,” असे पिनराई विजयन यांनी म्हटलं आहे. “राहुल गांधी केरळमध्ये आले आणि अनपेक्षित हस्तक्षेप केले. देशाच्या इतर भागात सुरु असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत…त्यांनी शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर चालवला, मच्छिमारांसाठी समुद्रात पोहण्यासाठी गेले. असो पण राहुल गांधी यांच्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक आहे,” असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या १९९० पासूनच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. तसेच राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली.राहुल गांधी यांची सोमवारी वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली काढली. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. थिरुअनंतपुरम येथे बोलताना त्यांनी डाव्या सरकारवर टीका करताना तरुणांना रोजगार तसंच मच्छिमारांचा मुद्दा मांडला होता.
पिनराई यांनी पत्रकार परिषदेदरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. “योगी आदित्यनाथ म्हणतात प्रत्येक गोष्टीमागे केरळ आहे. रोजगार नसल्याने येथील तरुण परदेशात जात असल्याचे ते म्हणाले आहेत. केरळमधील १५ टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशातील असून त्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. केरळ सरकार लोकांमध्ये भांडणं लावत असल्याचाही आरोप त्यांनी केला. पण गेल्या पाच वर्षात केरळमध्ये एकही जातीय हिंसाचार झालेला नाही. पण उत्तर प्रदेशात काय स्थिती आहे? आपण पाहिलं आहे. महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.