नवी दिल्ली – दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जम्मू काश्मीरातील पोलिस अधिकारी दविंदरसिंग याला गप्प करण्यासाठीच त्याची केस एनआएचे प्रमुख वाय. सी. मोदींकडे सोपवण्यात आली आहे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. याच मोदींनी आधी गुजरात दंगली आणि हरेन पांड्यांच्या हत्या प्रकरणाचा तपास केला होता असेही राहुल गांधी यांनी नमूद केले आहे.
दहशतवादी दविंदरसिंग याचे प्रकरण दाबून टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याची केस एनआयएकडे सुपुर्त करणे हाच आहे. एनआयएचे नेतृत्वही दुसरे मोदीच करीत आहेत. त्यामुळे ही केस आता जवळपास दाबून टाकल्यासारखीच स्थिती आहे अशी टिपण्णीही राहुल गांधी यांनी केली आहे. दविंदर सिंग यानेच पुलवामा हल्ल्याच्य प्रकरणात दहशतवाद्यांना मदत करण्याची भूमिका बजावली होती त्यावरून सध्या वृत्तपत्रांतून उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हा विषय उपस्थित करीत खोचक टोमणे सरकारला उद्देशून मारले आहेत.