बंगळूर : मध्यप्रदेशातील राजकीय घडामोडींमुळे कॉंग्रेसमधील अस्वस्थता वाढीस लागली आहे. त्यातून कॉंग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे राहुल गांधी यांनी स्वीकारण्याची वेळ आल्याची भावना पक्षात तीव्र बनल्याचे दिसत आहे.
मागील काही काळापासून नेतृत्वाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसमध्ये चर्चा, मतभेद याबाबींना उधाण आले आहे. राहुल यांनी पुन्हा नेतृत्व स्वीकारावे, असा सूरही त्या चर्चेवेळी निघत होता.
आता मध्यप्रदेशातील उलथापालथींमुळे कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्या प्रतिक्रियेतून ते सूचित झाले.
मध्यप्रदेशात काय घडायचे ते घडूद्या. पण, राहुल यांनी आघाडीवर राहून नेतृत्व करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाला राहुल यांची गरज आहे. त्यांनी नेतृत्व स्वीकारून पक्षाच्या वरच्या स्तरावर ठळक बदल करावेत, असे राव यांनी म्हटले.
सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.
आता पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या निवडीच्या मुद्द्याने काही दिवसांपासून डोके वर काढले आहे. मध्यप्रदेशातील घडामोडींमुळे त्या मुद्द्याला आणखी हवा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.