IND vs SL – भारत आणि श्रीलंका यांच्यात काल (गुरुवारी) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन (एमसीए) मैदानावर मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता ही मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी तिसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. दरम्यान, सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी द्रविड यांची मराठी भाषेविषयीची एक झलक पाहायला मिळाली.
द्रविड यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करताना मराठीत बोलण्यास सुरुवात केली. त्यांनतर लगेच त्यांनी पत्रकारांना मी इंग्रजीत बोलतो अशी विनंती केली. मात्र, पत्रकारांनी त्यांना मराठीत बोलणे सुरु ठेवण्याचा आग्रह केला. द्रविडने एक विनोद केला आणि त्यानंतर तो म्हणाला की,”मी इंग्रजीत बोलतो. लोकांना समजणार नाही. माझी मराठी माहित नाही, पण ठीक आहे.”
राहुल द्रविड यांचा जन्म इंदोरचा जरी असला तरी ते एका मराठी भाषिक ब्राम्हण कुटुंबात लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांना मराठी भाषेची चांगली आवड आहे. ते चांगल्याप्रकारे मराठी भाषा बोलू शकतात. पत्रकार परिषदेत सामन्याबाबत बोलताना द्रविड म्हणाले की,”या मैदानावर अनेक षटकार मारले जातात. श्रीलंकेने १४ षटकार मारले, आम्ही १२ षटकार मारले. अक्षर पटेलने वानिंदू हसरंगाविरुद्ध खणखणीत षटकार खेचले. येथे सामन्यात पुनरागमन करणे शक्य होते.”
Dravid’s super cute Marathi interaction with journo at press conference following 2nd #INDvsSL T20I.
Video credit @BCCI pic.twitter.com/nluSvAJJ8E
— Renin Wilben Albert (@reninwilben) January 5, 2023
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने दमदार खेळ केला. पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी भारताच्या गचाळ गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतला आणि २०६ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्यत्तरात भारताचे सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा राहुल त्रिपाठीही अपयशी राहिला.
त्यानंतर सूर्यकुमार यादवने (३६ चेंडूत ५१ धावा) भारताच्या डावाला सावरले. मात्र, संघाला शेवटच्या क्षणी आवश्यकता असताना तो बाद झाला. अक्षर पटेलने (३१ चेंडूत ६५ धावा) तुफानी फलंदाजी करत भारताला विजयच्या जवळ नेले. शिवम मावी (१५ चेंडूत २६ धावा) यानेही त्याला उत्तम साथ दिली. पण, धावसंख्या मोठी असल्याने भारताला १६ धावांनी पराभव पत्करावा लागला.