पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर आता टीम इंडियाला २७ ऑक्टोबरला नेदरलँड्सशी सामना खेळायचं आहे. भारत-नेदरलँड्स सामना गुरुवारी सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना असणार आहे. त्याचबरोबर या सामन्यावर पावसाचे संकट ओढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर केएल राहुलबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन्ही फलंदाज घाबरलेले दिसत असल्याचे अख्तरने म्हटले आहे.
#T20WorldCup2022 | इंग्लंड, न्यूझीलंड आणि द.आफ्रिकेसोबत जे झालं तेच भारतासोबतही होण्याची दाट शक्यता
शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “भारतीय संघाच्या पाकिस्तानवर विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन, परंतु भारताचे सलामीवीर सामन्यात दबावात आणि घाबरलेले दिसत होते. दोघांनाही गोलंदाजांविरुद्ध चांगल्याप्रकारे फलंदाजी करता आलेली नाही. कर्णधार म्हणून रोहित शर्माने स्वतःला थोडे शांत ठेवले पाहिजे. त्याचबरोबर केएल राहुल त्याच्या फलंदाजीवर गरजेपेक्षा जास्त लक्ष केंद्रित करतो आणि दबावाखाली येतो. त्यामुळेच या दोन्ही फलंदाजांना पाकिस्तानविरुद्ध अपयश आले.”
विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर ४ गडी राखून मात केली. या सामन्यात विराटने ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा करत पाकिस्तानच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. त्याची ही खेळी पाहून शोएब अख्तर देखील घाबरलेला दिसतोय. तो टी-२० क्रिकेटमध्ये विराटच्या निवृत्तीसाठी प्रार्थना करत आहे. शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर विराटच्या निवृत्तीची इच्छाही व्यक्त केली आहे.
शोएब अख्तर पुढे म्हणाला की, “विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी माझी इच्छा आहे.” यासोबतच अख्तरने इफ्तिखार अहमद, शान मसूद आणि पाकिस्तानी संघाचेदेखील जोरदार कौतुक केले. मसूद आणि इफ्तिखार यांच्या अर्धशतकांमुळेच पाकिस्तानी संघाला १५९ धावा करता आल्या होत्या. त्याचबरोबर शोएबने वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि नसीम शाह यांचेही कौतुक केले. या दोघांनी ३१ धावांवर भारताच्या ४ गड्यांना बाद केले होते.