संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची टीका
बेंगळूरु: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असतानाच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल आणि त्यांचे कुटुंबीय हे “बनावट गांधी’ असल्याची टीका केली आहे. कॉंग्रेस आणि तथाकथित सेक्युलर पक्ष मिळून देशात अशांतता निर्माण करण्यासाठीच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याच प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
“मी राहुल गांधी आहे. राहुल सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी हे राहुल सावरकर बनणे शक्यही नाही.’ असे जोशी म्हणाले. ते हुबळीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राहुल, सोनिया आणि प्रियांका हे सर्वजण “बनावट गांधी’ आहेत. त्यामुळे ते इतरांबाबत असेच बोलू शकतात, असेही जोशी म्हणाले.
राजकीय फायद्यासाठी राहुल गांधींनी त्यांचे आडनाव ‘चोरी’ केले आहे. म्हणून त्यांनी ते टाकले पाहिजे, असा दावा भाजप नेते संबित पात्रा यांनी रविवारी केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांना “भूमीपुत्र’ असे संबोधले होते, तर त्यांचा नातू मात्र त्यांचा अपमानास्पद उल्लेख करत आहे, अशी टीकाही पात्रा यांनी केला.