राहाता – शहरातील बसस्थानक हे गुन्हेगार व तळिरामांचा अड्डा बनल्याने एसटीच्या प्रवाशांसाठी, विशेषतः महिलांसाठी असुरक्षित बनले आहे. राज्य परिवहन मंडळाचे प्रशासन, तसेच राहाता पोलिसांनी या प्रश्नी वेळीच लक्ष घालून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करून प्रवाशांना बसस्थानकात सुरक्षितता प्रदान करून द्यावी; अन्यथा याविरोधात जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा राहाता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.
राज्य मार्ग परिवहन मंडळाचे राहाता येथील बसस्थानक प्रवाशांच्या दृष्टीने असून अडचण नसून खोळंबा अशा स्वरूपाचे बनले आहे. या बसस्थानकावर सातत्याने अस्वच्छता दिसून येते. प्रवाशांना मोठ्या दुर्गंधीचा सामना या ठिकाणी करावा लागतो. त्याचबरोबर अनेक चालक बसस्थानकात आतमध्ये प्लॅटफॉर्मवर बस आणत नसल्यामुळे प्रवाशांना बसस्थानक सोडून रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये बसण्याकरिता धावपळ करावी लागते.
ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना हे शक्य नसल्याने अनेक बसेस निघून जातात. येथे अपवाद वगळता अनेक बसचालक नगर-मनमाड महामार्गावरच बस थांबून प्रवाशांची चढ-उतार करत असतात. सायंकाळी अनेक व्यसनाधीन लोक बसस्थानकात ग्रुपने बसून मद्यप्राशनाचा कार्यक्रम, तसेच स्मोकिंग करत असतात. बस स्थानकात दिवसा पीक पॉकेटिंग करणाऱ्या महिला फिरत असल्याची चर्चा असून, या ठिकाणाहून बसून बाभळेश्वरपर्यंत जाताना अनेक महिलांचे दागिने, सोन्याचा ऐवज व पर्समधील पैसे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
पोलिसांनी बसस्थानकावर आपली गस्त वाढवावी. त्याचबरोबर राज्य मार्ग परिवहन मंडळानेसुद्धा या ठिकाणी स्वच्छतेवर लक्ष द्यावे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसून बसस्थानकावर तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवावी म्हणजे या ठिकाणी गोंधळ घालणारे तळीराम, चोरी करणारे गुन्हेगार व महिला मुलींची छेडछाड करणारे आरोपी पकडले जातील. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून पोलिसांनी व एसटी प्रशासनाने येथे सुरक्षितता प्रदान करून प्रवाशांना दिलासा द्यावा.