भाजप नेते निलेश राणे यांची संजय राऊतांवर टीका
नवी दिल्ली : राज्यसभेतील आसनव्यवस्था बदलल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत चांगलाच तांडव केला होता. त्यासाठी त्यांनी बुधवारी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना यासंदर्भात पत्रही पाठविले. यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. ‘संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला पाहिजे’, असे ट्विट निलेश यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवरून आता नवे राजकारण सुरू होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
संसदच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. त्याआधीच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केली. तसेच त्यांची आसनव्यवस्था विरोधी बाकावर करण्यात आली. यामुळे राऊत यांची राज्यसभेतील आसनव्यवस्थाही बदलण्यात आली आहे. मात्र याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत माझी आसनव्यवस्था करणे हे धक्कादायक आहे. कुणी तरी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी, आमचा आवाज दडपण्यासाठी हा प्रकार करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. याबाबत आक्षेप नोंदवणारे पत्रही त्यांनी बुधवारी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना पत्र पाठविले आहे.
संजय राऊत यांच्या या कृतीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. ‘2019 चा रड्या ऑफ द ईयर अवार्ड संज्यालाच दिला पाहिजे.’ मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच, असं ट्विट निलेश यांनी केलं आहे. या पुर्वीही निलेश यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या दिवशी ट्विटवरुन टीका केली होती.