इंद्रायणीनगर – वाढत्या शहरीकरणामुळे मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहे. या सिमेंटच्या जंगलात हिरवीगार झाडांची वनराई लुप्त झाली असून इमारतीतील वृक्षांची जागा आता मोबाइल टॉवरने घेतली आहे. शहरातील वाढत असलेल्या या मोबाइल टॉवर्समधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह लहरींचा आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.
शहरात मोकळी जागा, टेरेसवर येथे मोबाइल टॉवर उभारण्यासाठी नागरिकांचा कल वाढत आहे. त्यातून संबंधित जागा मालकाला चांगलाच आर्थिक फायदा होत. त्यामुळे शहरात दिवसेंदिवस या टॉवरच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, यातून निघणाऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह लहरींचा मनुष्याच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे. त्यातून अनेकांना विविध आजार जडत आहेत. तर काही अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षांचा किलबिलाट शांत झाला आहे.
उंच इमारतींना पसंती
शहरात वाढत्या मोबाइल टॉवरच्या संख्येत वाढ झाल्याने त्यातून निघणाऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह लहरींचे उत्सर्जन वाढले आहे. यामुळे उष्णतेमध्ये वाढ झाल्याचे जाणवते. नवीन झालेल्या वसाहतीत अनेक मोबाइल कंपनी टॉवर उभारण्यासाठी आग्रही असतात. काही न करता भाडे रूपात मिळणाऱ्या वीस हजार ते पंचवीस हजार रूपयांसाठी इमारतीवर टॉवर बसविण्यासाठी नागरिकांची चढाओढ असते.
उंच इमारतीच्या छतावर मोबाइल टॉवर, जनरेटर सेट, बॅटरी असे अंदाजे तीन ते चार टन वजनाचा अतिरिक्त भार लादल्या जातो. यासाठी लागणारी वीज मालकांकडून घेतली जाते. त्यामुळे वेगळा खर्च करावा लागत नाही. तसेच रहिवाशी जागी असल्याने सुरक्षा रक्षकाची गरज भासत नाही. मोकळ्याजागेत टॉवरला जागेचे भाडे, उंच टॉवर उभारण्यासाठी लागणारा खर्च, सुरक्षा रक्षक असा वाढता खर्च कमी करण्यासाठी मोबाइल कंपन्या इमारतींना प्राधान्य देतात.
टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह लहरींचा पर्यावरणावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. तसेच मनुष्याच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होताना दिसत आहे. या पूर्वी चिमण्या, कावळे यांचा थवा आता दिसेनासा झाला. परिणामी पक्षांच्या अनेक जाती नष्ट झाल्याने निसर्गाची समतोल बिघडला आहे.
मानवी स्वास्थ्य बिघडले
मोबाइल टॉवर्समधून निघणाऱ्या घातक लहरींचा मानवी जीवनावर दुष्परिणाम दिसत आहे. त्यामुळे अनेक आजार होणे आणि बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाइल फोन हाताळतांना शरीरापासून दूर ठेवावा. छातीजवळ, डोक्याजवळ, खिशात, मांडीजवळ सतत मोबाइल ठेवल्यामुळे हाता-पायांना मुंग्या येणे, डोके जड होणे, डोळ्यांची जळजळ होते. तसेच लहरींचा मासपेशींसोबत संपर्क आल्याने त्या ठिकाणच्या पेशी मृत होत असल्याचे वैज्ञानिकांनी प्रयोगाअंती सिद्ध केले असून तज्ज्ञ डॉक्टरांनी याला दुजोरा दिला आहे.