नवी दिल्ली – शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनसमोर शांतता, सुरक्षा आणि अविश्वास ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. तसेच अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींमुळे कट्टरवाद तीव्र झाला आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वार्षिक शिखर परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना सांगितले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आदल्या दिवशी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेत शिखर परिषदेच्या वेळी त्यांच्याशी सीमाप्रश्नावर चर्चा केली. या बैठकीत पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे सामील झाले. एस. जयशंकर सध्या ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले, कट्टरतावाद आणि असुरक्षेमुळे या क्षेत्रातील विशाल आर्थिक क्षमताही दुर्लक्षितच राहिली आहे. खनिज संपत्ती असो किंवा आंतर एससीओ व्यापार, याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आपल्याला परस्पर संपर्कावर भर द्यावा लागेल. इतिहासात मध्य आशियाची भूमिका प्रमुख क्षेत्रीय बाजारांमध्ये एका संपर्क पूलाची राहिली आहे. हाच या क्षेत्राच्या समृद्धीचाही आधार होता. भारत मध्य आशियासोबत आपला संपर्क वाढवण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्य आशियाई देशांना भारताच्या विशाल बाजारांशी जोडले जाण्याने अपार लाभ होऊ शकतो. दुर्देवाने, आज संपर्काचे अनेक पर्याय त्यांच्यासाठी खुले नाहीत. ईराणच्या चाबहार बंदरातील आमची गुंतवणूक, आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरीडॉर प्रति आमचे प्रयत्न, याच वास्तवतेने प्रेरित आहे, असे मोदी म्हणाले.