पुणे – मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार, असं सातत्याने सांगण्यात येत आहे. काही नेत्यांनी मुदतही दिली होती. मात्र अद्याप सरकार कायम आहे. त्यातच आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कसं पडेल हे सांगितलं.
आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार असून फक्त वेळेचा प्रश्न आहे, असं भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
विखे पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून सरकारवर निशाणा साधला. राज्यातील आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत आहे. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही, असं सांगतानाच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत भाजप निर्णय घेईल, असं विखे-पाटील यांनी स्पष्ट केलं.
विखे पाटील यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सरकारने प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होते. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती. मात्र, ते न करता सर्व काही केंद्र सरकारवर ढकलंत आहे. काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलायचं ही आता फॅशन झाल्याचे त्यांनी म्हटलं.