वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगांचा
प्रादुर्भाव : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ज्वारी भूईसपाट
काऱ्हाटी (वार्ताहर) – यंदा पाऊस दमदार झाल्याने हुडहुडी भरवणारी थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, या उलट घडले असून बोटावर मोजण्या इतक्या दिवसच बारामती तालुक्यात थंडी जाणवली असून त्यातही गुलाबी थंडीचा अनुभव यंदा मिळालच नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रब्बी हंगामासाठी थंडीची नितांत आवश्यकता असते; मात्र पिकांना पोषक अशी थंडी यंदा जाणवलीच नसल्याने रब्बी हंगामाला याचा फटका बसला असून यंदा उत्पदनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वातावरणात होण्याऱ्या नित्याच्या बदलामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, ज्वारी यासह भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तर पिके वाचवण्यसाठी शेतकरी विविधप्रकारच्या औषधांची फवारणी करीत असला तरी वातावरण पोषक नसल्याने किडिचा प्रादुर्भाव काही केल्याने थांबत नसल्याने बळीराजा हैराण झाला आहे.
बारामती तालुक्यात सलग चार ते पाच वर्षे दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा वरुणराजाने साथ दिली. जरी खरीप हंगाम शाश्वत नसला तरी काही शेतकऱ्यांनी खरिपातील पिके घेतली मात्र, तोडणीवेळी आलेल्या परतीच्या पावसाने हातचे पीक जरी हातचे गेले तरी बळीराजाने न डगमगता शाश्वत अशा रब्बी हंगामातील पिकांची जोरदार पेरणी केली होती. त्यातच दमदार झालेल्या पावसामुळे जमिनिला अनेक दिवस ओल कायम होती तर सुरुवातीला पोषक असे वातावरण मिळाल्याने पिके देखील दमदार आली. तर काही पिके काढणीला आली असतानाच वातावरणात झालेला बदल व सुसाट वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक बऱ्यापैकी भूईसपाट झाल्याने तालुक्यातील शेतकरी डोक्याला हात लाऊन बसला आहे.