अकोले (प्रतिनिधी) – पालकमंत्र्यांसमवेत कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज दुपारी बारा वाजता निळवंडे धरणातून रब्बी हंगामासाठी 1200 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत नगर येथे बुधवारी (दि.23) कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी, जलसंपदाचे प्रमुख अधिकारी बैठकीला ऑनलाइन हजर होते. त्यावेळी रब्बीचे दोन व उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत. झालेल्या निर्णयानुसार आज हे आवर्तन सोडण्यात आले आहे. वीस दिवस हे आवर्तन चालणार असून त्यासाठी किमान तीन टीएमसी पाण्याचा वापर गृहीत धरण्यात आला आहे. या आवर्तनाने रब्बी पिकांना उभारी मिळणार आहे.
आवर्तन सोडण्यात आलेल्या काळात पूर्वीप्रमाणे विजेचे भारनियमन सुरू राहणार असून, कोणत्याही प्रकारे रब्बी हंगामाला बाधा पोहोचणार नाही व इतरही भागात शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, असे नियोजन आखण्यात आले आहे.
यापूर्वी चार दिवसांचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले गेले होते. आता हे शेतीचे आवर्तन असून, तीन टीएमसी पाणी वापरले गेले, तरीही भंडारदरा व निळवंडे धरणांतून मिळून किमान 17 टीएमसीच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.
त्यामुळे पुढील सहा महिन्यांच्या काळात प्रवरा नदीकठच्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता नाही व लाभक्षेत्रातील पिकांनाही त्यामुळे पाण्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे, असे सांगण्यात आले.