मुंबई – राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने आर. आर. पाटील यांच्या नावाने स्मार्ट व्हिलेज बक्षिस योजना जाहीर केलीआहे. त्यात तालुका आणि जिल्हा पातळीवर निवड झालेल्या गावांना मोठा निधी दिला जाणार आहे. या योजनेला राज्य मंत्रीमंडळाची लवकरच मान्यता दिली जाईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिली.
ते म्हणाले की स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, अपारंपारीक उर्जा, माहिती तंत्रज्ञान याचा उत्तम उपयोग करून घेणाऱ्या गावाला हा पुरस्कार दिला जाणार आहे. तालुका पातळीवर हा पुरस्कार वीस लाखाचा असणार असून जिल्हा पातळीवर विजयी ठरलेल्या गावाला पन्नास लाखांचा पुरस्कार दिला जाणार आहे.
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी गावच्या विकासासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना सन 1999 साली सुरू केली होती. त्यामुळे त्यांच्याच नावाने ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.