-शेतकरी, पर्यटक सुखावले : रखडलेल्या भात लावणीला गती
नाणे मावळ – आठवडाभर पाठ फिरविलेल्या पावसाने कामशेतसह नाणे मावळात हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी व पर्यटक सुखावले असून रखडलेल्या भात लावणीला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सलग दोन आठवडे पाऊस पडल्यानंतर दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. 15 जुलैनंतर कामशेत परिसरात दोन-तीन दिवसांच्या उघडीपीनंतर जोरदार पाऊस पडला.पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती. परंतु, पुन्हा पावसाने पाठ फिरविली. पुन्हा चक्क कडक ऊन पडल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. काही शेतकऱ्यांना भात लागवडीसाठी शेतात पाणीच नसल्याने भात लागवडही रखडली. या पावसामुळे भात रोपे लावून झालेल्या शेतकऱ्यांना या पावसाने समाधान वाटले.
जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले होते. दरम्यान, पावसाने ओढ दिल्यामुळे मावळातील डोंगर दऱ्यातील फेसाळत पडणारे धबधबे व तुडुंब भरून वाहणारे ओढे, हिरवागार निसर्ग पर्यटकांना अनुभवायला मिळत नव्हता. परंतु पावसाच्या जोरदार पुनरागमनाने पर्यटक देखील सुखावले.