नवी दिल्ली – मणिपुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने गोमुत्राच्या विषयावरून भाजप नेत्यांवर टीका केल्यानंतर त्याला मणिपुर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली आहे. त्याला आजच सायंकाळी पाच वाजेपर्यंत कारागृहातून सोडावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे.
न्या चंद्रचुड आणि न्या एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला असून त्यांनी म्हटले आहे की संबंधीत व्यक्तीला अशा प्रकारे डांबून ठेवले तर तर घटनेच्या आर्टिकल 21 नुसार त्याच्या मुलभूत अधिकाराचा तो भंग ठरतो. त्यामुळे त्यांनी संबंधीत कार्यकर्त्याला आजच्या आज सोडण्याचा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या मंगळवारी घेण्याचे कोर्टाने जाहीर केले. आपला आदेश मणिपुर पोलिसांपर्यंत त्वरीत पोहचवला गेला पाहिजे अशी सूचनाहीं कोर्टाने केली.
लिचोम्बाम एरनेद्रो असे रासुका खाली अटक करण्यात आलेल्या कार्यर्त्याचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्यावरील कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. आपल्या मुलाने 13 मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकून गोमुत्र किंवा गाईच्या शेणाने करोना बरा होत नाही असे म्हटले होते. भाजपच्या मणिपुरच्या प्रदेशाध्यक्षांचा करोनाने मृत्यु झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट टाकण्यात आली होती. भाजपकडून अवैज्ञानिक माहिती व दावे केले जात असल्याचे त्याने म्हटले होते. त्यातून हा प्रकार घडला आहे.