दाता होणं प्रत्येकालाच जमत नाही. मुळात आपण समाजाचं देणं लागतो, हीच गोष्ट अनेकांना माहित नसते. त्यासाठी व्यक्तीवर तसे संस्कार लागतात. कुटुंबातून, सभोवतालच्या वातावरणातून हे संस्कार होत असतात. सामाजिक काम हेच त्यांचे मूळ पिंड असते. राजकारण जसे रक्तात असावे लागते, तसेच समाजकारणही रक्तातच असावे लागते. पार्थदादा पवार यांच्याबाबतीत हे म्हणणे अगदी समर्पक आहे. कारण राजकारणात असूनही ते जास्तीत जास्त वेळ समाजकार्यासाठी घालवतात, यातच सगळं आलं.
मागील वर्षापासून अवघ्या विश्वाला ग्रासलेल्या करोना संक्रमणापुढे माणूसच काय पण विज्ञानाने आणि निसर्गानेही हात टेकले. करोनाकाळात अनेकांनी आपली नोकरी गमावली,रोजगार गमावला तसेच आपले जिवलगही गमावले.. याकाळात माणुसकीची नव्याने ओळखही झाली. संकटात सापडलेल्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला.
काहींनी गाजावाजा करीत मदत केली तर काही मोजक्या लोकांनी अगदी या कानाच त्या कानाला न कळवता शांतपणे लोकांना मदत केली. पार्थदादा पवार हे त्यातलेच. कोविड योध्दयाचे इतके शांत, समंजस रूप पाहून सामान्यातला सामान्य माणूसही पार्थदादांचा चाहता झाला. केवळ करोना कालावधीतच नाही, तर मागील अनेक वर्षांपासून पार्थदादांचं वेगवेगळ्या स्तरातील सामाजिक कार्य शांतपणे सुरू आहे, कसलाही गाजावाजा न करता !
करोनाच्या टाळेबंदीत पीडित नागरिकांना मोफत अन्न-धान्य वाटप, गरजूंना किराणा सामान वाटप व वैद्यकीय उपचारांची मोफत सुविधाही पार्थ पवार फाऊंडेशनमार्फत पोहोचविण्यात आली.या काळात स्वतः पार्थदादा उपस्थित राहायचे, लोकांना धीर देत त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायचे आणि मदत करायचे. त्यांनी या काळात दररोज ५००० लोकांना अन्नधान्य पुरवले!
जिल्ह्यातील कर्तव्य सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, मदतनीस, पोलीस, सामाजिक गट तसेच सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींना मोफत मुखवटे व सॅनिटायझर्सचे वाटपही करण्यात पार्थ पवार फाउंडेशन अग्रेसर राहिले आहे. प्रसिद्धीचा हव्यास न धरता सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत राहण्यावर पार्थ दादा पवार यांचा अधिक भर असतो.
पार्थदादांनी समाजकारणाची प्रेरणा आपल्या मातोश्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून घेतली. पार्थ यांच्या सामाजिक कामाची झलक पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि विद्या प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर इत्यादींच्या माध्यमातून दिसून येते. सुरुवातीच्या काळात अनेक उपक्रमांतून पार्थ यांनी पर्यावरणपूर्ण उपक्रमांचा पाठपुरावा केला.
अनेक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी अनेक समाजोपयोगी, शैक्षणिक कार्याचा श्रीगणेशा बारामतीपासून केला. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मावळ लोकसभा मतदार संघातील जनतेला पार्थ दादांचा जवळून परिचय झाला. तिथेही अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले.
या भागातले युवकांचा रोजगाराचा प्रश्न औद्योगिक विभागातील विविध प्रश्नावर भर दिला. ‘पार्थ पवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून ते नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेत असतात. ग्रामीण भागासह शहरी भागातील गरजू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, सायकली पुरविणे यांसारख्या विविध योजना पार्थ पवार यांच्या पुढाकाराने सातत्याने राबविल्या जातात.
गरजू नवोदित मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून अशा मुलांना पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमांतून शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. पार्थ दादा पवार यांच्या प्रयत्नातून पुण्यात रोजगार मेळाव्यामार्फत युवा वर्गासाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठीही उपक्रम हाती घेण्यात येतात.
पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने एक अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरं राबविले जातात. कर्जत, रायगड, उरण भागांत मोठ्या प्रमाणावर शिबिर राबविले जातात. मोतीबिंदू रुग्णांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली जाते.
पार्थ दादा पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना नवी दृष्टी मिळते. पार्थ दादा स्वतः रुग्णांची भेट घेतात. त्यांची विचारपूस करतात. पार्थ दादा म्हणतात ‘या सर्वांचे आशीर्वाद हीच माझी खरी कमाई.’ आपल्या वडिलांप्रमाणेच पार्थ दादाही अडल्या नडलेल्या सर्वांच्या मदतीला नेहमीच उपलब्ध असतात. त्यांच्या याच स्वभावामुळे आज ते कार्यकर्त्यांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.