राजगुरूनगर -रविवार आणि सोमवार या दोन दिवसाची सुट्टी आणि लॉकडाऊन असल्याने अनेकांना पैशांची चणचण जाणवत आहे. यामुळे नागरिकांनी आज बॅंकांमध्ये मोठी गर्दी केली होती. अगदी ग्रामीण भागातही बॅंक उघडण्याअगोदर मोठ्या रांगा लागल्या होत्या. करोना विषाणू पसरत असताना नागरिक मात्र सोशल डिस्टन्स पाळत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
खेड तालुक्यात आज सर्वत्र खासगी आणि सहकारी बॅंकेत नागरिकांची गर्दी झाली होती. यात पैसे काढणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. शेतकरी, कामगारांनी साठवलेली पुंजी जी काही बॅंकेत आहे, ती काढण्यासाठी त्यांनी बॅंकेत रांगा लावल्या होत्या.
यात शहरासह ग्रामीण भागातील बॅंकांमध्ये प्रथमच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राजगुरूनगर, चाकण, आळंदी या शहरांसह कडूस, वाडा, डेहणे, पाईट, वाफगाव, दावडी, म्हाळुंगे, चास आदी भागात असलेल्या खासगी आणि सरकारी बॅंकेत शेतकरी कामगार वर्गाने मोठी गर्दी केली होती.
खात्यात पैसे भरण्यापेक्षा खात्यातील पैसे काढणाऱ्यांची संख्या 80 टक्क्यांपर्यंत होती. सध्या सर्वत्र करोनाचे मोठे संकट आहे. त्यापासून वाचण्यासाठी नागरिक घरी आहेत. लॉकडाऊन झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने साठवलेली पुंजी काढण्यासाठी गर्दी झाली होती. कोणीही सोशल डिस्टन्स पाळत नव्हते; एव्हाना बॅंकेनेही तशा सोयी न केल्याने करोना विषाणूच्या प्रसाराची भीती व्यक्त केली जात आहे.
या रांगेत असलेल्यांना अनेकजणांना सूचना करूनही नागरिक ऐकत नव्हते. त्यातच बॅंकांची वेळ कमी केल्याने दूरवरुन आलेले नागरिक रांगा सोडत नव्हते. डेहणे, वाडा, कडूस आदी भागातील बॅंकांमध्ये सकाळीपासून नागरिकांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
डेहणे येथील एका बॅंकेच्या बाहेर सकाळी आठ वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यात सोशल डिस्टन्स अजिबात पाळला नाही. याभागात अनेक नागरिक मुंबई, पुणे शहरातून आले आहे. त्यांची बॅंकेत येण्याची संख्या मोठी होती असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.