जुन्नर -करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउनचा निर्णय झाला. तीनवेळा लांबलेल्या लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. सरकारच्या तिजोरीत येणारा पैसाही पूर्णपणे बंद झाला. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी जीवनावश्यक नसलेली दारूची दुकानं सुरू करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आज मद्यपींनी सोशल डिस्टनसिंगला धुडकावून लावल्याचे चित्र दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तळीरामांनी घातलेल्या धुमाकुळामुळे मद्यविक्रीचा निर्णय रोखण्यात आला आहे.
दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ नागरिक लॉकडाऊनचे प्रामाणिकपणे पालन करीत आहेत. शेतीमाल विकणारे, शेतीसाठी इंधन आणणारे शेतकरी, दशक्रिया करणारे नातेवाईक किंवा गावांत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, गाड्या जप्त केल्या. अनेक आजारी वृद्ध, व्यापारी, विद्यार्थी किंवा जवळपास सर्वांनीच या कठीण वेळेत नुकसान सोसून नियमांचे पालन केले. मात्र, मद्यविक्रीच्या निर्णयाचा समाजातील विविध स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. आकडेवारीनुसार मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून शासनाला जास्त महसूल मिळतो, असा दावाही काही व्यावसायिकांनी केला आहे.
एकीकडे शिवभोजन, मोफत जेवण, किराणा साहित्य वाटप आदी उपक्रमांद्वारे गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे, तर दुसरीकडे दारूच्या दुकानांसमोर कडक उन्हातील लांबलचक रांगा पाहून विरोधाभास निर्माण होत आहे. विशेष म्हणजे नोटबंदीच्या काळात चक्कर आल्यासारखी प्रकरणे यंदाच्या रांगेत घडली नसल्याचे सुखद चित्र आहे.