‘टीईटी, शिष्यवृत्ती परीक्षांतील प्रकरण : “त्या’ बड्या एजन्सीची अखेर कबुली
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याची कबुली बड्या एजन्सीने दिली आहे. “एक वेळ माफ करा, यापुढे आता परीक्षा घेताना कोणत्याची चुका होणार नाहीत,’ अशी विनंतीही संबंधित एजन्सीने परीक्षा परिषदेकडे केली आहे. आधी चूक करायची व पुन्हा सुधारणा करू असे म्हणणे हा एजन्सीच्या अजब कारभाराचा नमुनाच म्हणावा लागणार आहे, अशी चर्चा आहे.
परीक्षा परिषदेच्या विविध परीक्षांचे सर्व कामकाज हे एजन्सीमार्फतच होते. त्यावर परीक्षा परिषदेचे केवळ नियंत्रण असते. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, इयत्ता पाचवी व आठवीसाठीची शिष्यवृत्ती, टीईटी या चार परीक्षांचे कामकाज एकाच एजन्सीकडे आहे. यासाठी 20 कोटी रुपये अदा करण्यात येत आहे. या एजन्सीची तीन वर्षांची मुदत आता लवकरच संपणार आहे. ही एजन्सी बड्या व्यक्तीची आहे. टीईटीसह इतरही परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये एजन्सीने चुका केलेल्या आहेत. याप्रकरणी एजन्सीला नोटीस बजावण्यात आली होती.
प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी एजन्सीला बजावले होते.
प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत या एजन्सीला नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात आला. यासाठी आठ दिवसांची मुदतही होती. प्रत्यक्षात एजन्सीने मुदतीनंतर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याकडे खुलासा सादर केला आहे. प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याने एजन्सीने मान्य केले आहे.
एजन्सीच्या प्रमुख अधिकाऱ्याने दाखल केलेला खुलासा परीक्षा परिषदेच्या येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या वित्त व कार्यकारी समितीचे सभेत मांडण्यात येणार आहे. यावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या एजन्सीवर दंडात्मक कारवाई होणार की चुकांवर पांघरूण घालणार, हा प्रश्न आहे.