लेटलतिफांना “टीईटी’साठी प्रवेश नाकारला : विद्यार्थ्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि.19) घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना बोलावून गोंधळ थांबवला. दरम्यान, प्रश्नपत्रिकेमध्ये टायपिंग आणि शुद्धलेखनाच्या भरमसाठ चुका असल्याचे समोर आले आहे.
परीक्षेसाठी राज्यातून 3 लाख 43 हजार 283 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 687 तर, पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विविध जिल्ह्यांत 1 हजार 44 परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली होती. यात पेपर क्रमांक 1 साठी 572 तर, पेपर क्रमांक 2 साठी 472 केंद्रांची व्यवस्था केली होती. या परीक्षेच्या कामकाजासाठी 26 हजार 67 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाही केल्या होत्या. विशेष भरारी पथकेही नेमली होती.
पुणे जिल्ह्यात पेपर क्रमांक 1 साठी 15 हजार 698 तर, पेपर क्रमांक 2 साठी 14 हजार 5 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पेपर क्रमांक 1 साठी 39 तर, पेपर क्रमांक 2 साठी 36 परीक्षा केंद्राची व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर 30 मिनिटे आधी उपस्थित राहण्याबाबत कळवले होते. मात्र, काही विद्यार्थ्यांकडून सूचनांचे गांभीर्याने पालन केले नाही.
पुण्यातील कसबा पेठेतील “आरसीएम’ गुजराथी हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर 10 विद्यार्थी उशिरा आले. त्यांनी परीक्षेला बसू द्यावे यासाठी प्रवेशद्वारावरच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. काही वेळाने हे प्रकरण शांत झाले, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळाली.