नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे बिम्सटेक संघटनेच्या सदस्य देशांमध्ये अधिक व्यापक सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
आपल्या प्रादेशिक सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देणे हे अधिक महत्वाचे बनले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. ऑनलाइन होत असलेल्या बिम्सटेक परिषदेच्या पाचव्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेच्या मुद्यांवरूनही आपल्या प्रदेशाच आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सहकार्य करणे ही काळाची गरज झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक पातळीवरील समस्या आपल्या प्रदेशापासून दूर राहिल्या नाहीत. कोविड-19 च्या साथीचे परिणाम आपले लोक आणि आपली अर्थव्यवस्था अजूनही भोगते आहे, असेही मोदी म्हणाले.
रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या संघर्षामुळे गेल्या काही आठवड्यात घडलेल्या घटनांमुळे बिम्सटेक ही प्रादेशिक पातळीवर अधिक सक्रिय होणे गरजेचे झाले आहे, बिम्सटेकचा जाहीरनामा प्रसिद्ध होणे ही संस्थागत संरचनेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल असेल. मैलाचा दगड असणारी ही परिषद बिम्सटेकच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीली जाईल, असेही ते म्हणाले.
आपल्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी बिम्सटेक सचिवालयाच्या क्षमतांमध्ये वाढ होणेही गरजेचे आहे. त्यासाठी केल्या जाणाऱ्या सूचनांचे स्वागत केला जायला पाहिजे. संस्था आणि देशांदरम्याचा संवाद वाढवला जावा. व्यापार सुविधांसाठा आंतरराष्ट्रीय निकष स्वीकारले जायला पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.