ब्रिस्बेन : ब्रिस्बेन येथे होत असलेली चौथी कसोटी सिडनीत खेळवली जाण्याची शक्यता खुद्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेच व्यक्त केली आहे. सिडनीतच तिसरी कसोटी झाल्यानंतर ही कसोटी खेळवली जाणार असल्याचे संकेत आहेत. ब्रिस्बेनला करोनाबाबतचे नियम जास्त कठोर असल्याने भारतीय संघाने तेथे जाण्यास नकार दिला असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतर क्वीसलॅंड सरकारच्या वतीने भारतीय संघाच्या भूमिकेवरुन वादग्रस्त विधान करण्यात आले आहे . ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्याने भारतीय संघास धमकीवजा इशारा दिला आहे.
क्वीसलॅंडच्या शेडो आरोग्य मंत्री रोस बेट्स (Ros Bates) यांनी ऑस्ट्रेलियन चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय संघाला इशारा दिलाय. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय संघाला नियमाप्रमाणे खेळायचे नसेल तर त्यांनी इकडे ब्रिस्बेनमध्ये येऊच नये. ते पुढे म्हणतात, येथे भारतीय संघाला नियम पाळावेच लागतील, यामध्ये कोणतेही बदल किवां दुर्लक्ष केलं जाणार नाही. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नियमाचं पालन करावंच लागेल, याला दुसरा पर्याय नाही. सर्वांना एकसारखेच नियम आहेत, असा उल्लेखही केला आहे. त्यांनी याबाबतीत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात या प्रकरणावरुन वाद निर्माण होऊ शकतात.
Today I was asked about reports the Indian Cricket Team wants quarantine restrictions eased just for them, ahead of the upcoming Gabba Test. My response 👇 #Cricket #IndiavsAustralia @ICC @CricketAus pic.twitter.com/MV7W0rIntM
— Ros Bates MP (@Ros_Bates_MP) January 3, 2021
दरम्यान, येत्या गुरुवारपासून तिसरी कसोटी सिडनीत सुरू होणार आहे. हा सामना पूर्ण होण्यापूर्वीच चौथ्या कसोटीबाबतची अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता आहे. चौथ्या सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. करोना तसेच विलगीकरणाबाबतचे ब्रिस्बेनमधील नियम अतिशय कठोर आहेत.
भारतीय संघ दोन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात बायोबबलच्या नियमाचे पालन करत आहे. तरीही जर संघ ब्रिस्बेनला दाखल झाला तर तिथे त्यांना सवलत मिळणार का, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नसल्याने सध्या हा सामना नक्की कुठे होणार याबाबतचा संभ्रम कायम आहे. ब्रिस्बेनला करोनाबाबतचे नियम जास्त कठोर असल्याने भारतीय संघाने तेथे जाण्यास नकार दिला असल्याचे वृत्त आहे.
अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाला दाखल झालेला भारतीय संघ 14 दिवस विलगीकरणात होता. त्यानंतर संघाला काही सवलत मिळण्याची शक्यता होती. मात्र, ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला पुन्हा एकदा विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना हॉटेल ते स्टेडियम एवढाच प्रवास करता येईल. त्याव्यतिरिक्त कुठेही बाहेर जाण्यावर बंदी राहील. त्यामुळे भारतीय संघाने ब्रिस्बेनला जाण्याऐवजी सिडनीमध्येच राहायचे ठरवले आहे.
रोहितसह पाच जण आयसोलेशनमध्ये, चाहत्यांशी जवळीक भारतीय खेळाडूंना भोवली
ब्रिस्बेनमध्ये विलगीकरणात राहण्याचीही तयारी आहे. मात्र, तेथील सामान्य नागरिकांप्रमाणेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले तरच तेथे जाण्याचा विचार करू, असे बीसीसीआयने म्हटले आहे. तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ आज (सोमवार) सिडनीला रवाना होणार आहे. गुरुवारपासून सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.