मंचर -आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराच्या हद्दीवरील काही गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून मंचर शहरात बुधवार (दि. 27) पासून बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला घरी न जाता 14 दिवस महात्मा गांधी विद्यालय येथील संस्थात्मक क्वारंटाइन कक्षात राहावे लागणार आहे.
या ठिकाणी रोजचा जेवणाचा खर्च ज्याचा त्यानेच करायचा आहे. ग्रामपंचायतीकडून फक्त राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. येथील नागरिकांनी चौदा दिवस पूर्ण झाल्यानंतरच आपल्या घरी जावे, अशी माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.
मंचर शहरात पुणे, मुंबई तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक नागरिक होम क्वारंटाइनबाबतचे नियम पाळताना दिसून येत नाहीत, त्यांनी काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे, मंचरमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी क्वारंटाइनचे नियम बंधनकारक असून, थेट घरी जाणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा सरपंच गांजाळे यांनी दिला आहे.