माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांची माहिती
11वी प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार
पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार दि. 26 डिसेंबरला एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या बदलामुळे गुरुवारी जाहीर होणारी विशेष फेरीची गुणवत्ता यादी स्थगित करण्यात आली आहे. त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
पुणे व पिंपरी-चिंचवड येथील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. 11वीच्या एकूण तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या, विशेष फेरीनुसार प्रवेश दिले जात आहे. गुरुवारी विशेष फेरीनुसार महाविद्यालय देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार होती. परंतु, राज्य शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना (एसईबीसी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयाच्या आधारे अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. अकरावी प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जामध्ये प्रवर्ग बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
दि. 26 डिसेंबरला हा बदल विद्यार्थ्यांना करायचा आहे. यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येईल व विशेष फेरीसाठी लगेच अर्ज सादर करता येणार आहे.कनिष्ठ महाविद्यालयांनी देखील विद्यार्थी विनंतीनुसार प्रवेश रद्द करून द्यायचे आहेत. दि. 31 डिसेंबरला महाविद्यालयांनी झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदवायचे आहेत. दि. 1 जानेवारी 2021ला रिक्त जागांचा तपशील जाहीर केला आहे.
केवळ प्रवेशशुल्क घेण्याच्या सूचना…
विद्यार्थ्यास घेतलेला प्रवेश रद्द करावयाचा असल्यास तशी विनंती संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयास करावी आणि आपला प्रवेश रद्द करून घ्यावा. प्रवेश रद्द करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शांतपणे विचार करावा. कारण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजित फेऱ्यांपैकी ही अखेरची प्रवेश फेरी आहे. कोविड-19 साथ रोग परिस्थिती, करोना विषाणू संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांचे प्रवेशशुल्क विद्यार्थ्यांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने जमा करून घ्यावे, अशा स्पष्ट सूचना शालेय शिक्षण विभागाने केल्या आहेत.