पुणे – राज्यातील विद्यार्थ्यांचे योग्यता प्रमाणपत्र अर्ज नियमित शुल्कासह विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सादर करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
करोनामुळे दहावी, बारावी परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेपेक्षा उशिराने जाहीर झाले. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र अर्ज स्वीकारण्याच्या प्रलचित तारखाऐवजी सुधारित तारखा कळविण्यात आल्या होत्या.
मात्र, अद्यापही करोना प्रादुर्भाव कायम असल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना पत्रही पाठविले आहे.
विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्यासाठी 16 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी असा मुदतवाढीचा कालावधी आहे. अतिविलंब शुल्कासह 16 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत मुदत आहे. अकरावीच्या प्रस्तावातील आवश्यक त्रूटींची पूर्तता करण्यासाठी 20 फेब्रुवारी, तर बारावीसाठी 5 फेब्रुवारी अशी मुदत आहे. केवळ या शैक्षणिक वर्षापूरत्यास तारखा बदललेल्या आहेत.