काल प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो तर सर मला म्हणाले, चार दिवस जरा फिरून आलो. राजस्थानातील मारवाड राहिला होता तो भाग बघून आलो. मग सरांनीच मला प्रश्न विचारला की सहज शिक्षण म्हणजे काय? मी म्हणालो की जे आपल्याला सहजतेने मिळते म्हणजे आपली मातृभाषा तसेच आपल्या घरातील वडीलधाऱ्यांनी दिलेल्या काही सूचना. देवळात चप्पल घालू नये वा वडीलधाऱ्यांचा मान राखावा. सरांनी मान डोलावली. शिक्षणाने प्रगती झाली असे आपण म्हणतो व ते खरेही आहे; पण केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षणानेच असे होते असे नाही. तसेच शिक्षण व सुसंस्कृतपणा हे नेहमी हातात हात घालून जातातच असे नाही. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होत असला तरी तो होतोच असे नाही. कित्येक अडाणी लोकही सुसंस्कृत असतात व त्यांना रीतीरिवाज व चारचौघांत कसे वागावयाचे हे चांगले माहीत असते. या उलट कित्येक सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असतातच असे नाही. केवळ कॉलेजात जातो वा कॉलेज पास होऊन आलेला आहे म्हणून त्याला चारचौघात कसे वागावे हे माहीत असतेच असे नाही.
मग सरच म्हणाले की, हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आम्ही मारवाड टूरवर गेलो तर आमच्या बरोबर एक कार सतत होती, जी टूर संपेपर्यंत आमच्यापाशीच होती. मग त्या कारच्या ड्रायव्हरपाशी हळूहळू बोलत असताना अनेक गोष्टी उलगडत गेल्या. मुळातच तो ड्रायव्हर तसा हुशार वाटत होता. गाडी चालवण्याचे नियम, कोठे एकतर्फा वाहतूक आहे, कुठे पार्किंगची सुविधा आहे, यांची त्याला इत्यंभूत माहिती होती. प्रत्येक ठिकाणाची त्याला मूलभूत माहिती होतीच. पण सहलीचा भाग नसलेल्या अनेक मधल्या ठिकाणीही त्याने आम्हाला नेऊन आणले.हॉटेल नवीनच असेल तर तो थेट जीपीएस चालू करून आम्हाला बरोबर नेत असे. वाटेत पेट्रोल पंप, हॉटेल्स कुठे आहेत तसेच पर्यटनासाठी कुठे लिफ्टची व्यवस्था आहे जेणेकरून आपण पटकन वरती जाऊन येऊ शकतो. मग आम्ही त्याला म्हणायचो की तुला बरीच माहिती आहे रे. मग त्यावर तो नम्रपणे म्हणाला की, प्रत्येक ड्रायव्हरला ही माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर तो पर्यटकांना कसा काय माहिती देऊ शकेल?
कोणकोणत्या बाजारांमध्ये कोणकोणत्या चांगल्या वस्तू मिळतात हे तो सांगे. मग एकदा न राहवून मी त्याला विचारले की तुझे शिक्षण काय? त्यावर तो म्हणाला, काय सांगू साहेब, दुसरी नापास आहे मी. सर म्हणाले, त्याचे हे उत्तर ऐकून मी जवळजवळ उडालोच. कारण दुसरी नापास असून तो मोबाइल इतका सफाईने वापरायचा व जीपीएस वगैरे असा चालू करायचा व व्यवस्थितपणे बरोबर घेऊन जायचा. तो म्हणाला की, बाबांनी लहान असताना काम करावयास सांगितले. ट्रकबरोबर क्लिनर म्हणून जायचो. अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत ट्रक टेम्पो चालविण्याचे लायसन्स काढले. पण हे करत असताना आपण कार चालवणे योग्य ठरेल असे वाटल्याने कारचेही लायसन्स काढले. त्या टुरिस्ट कार फर्ममध्ये मी गेली बारा वर्षे आहे.
तर सांगायचा मुद्दा हा की सहज शिक्षणातून व अवलोकनातून त्याने हे सारे साध्य केले आहे. त्याच्या पूर्वीच्या परिस्थितीतून हळूहळू वर येण्याचे प्रयत्न त्याचे चालू आहेत. कामाप्रमाणे महिन्याचा पगार व आमच्या सारखा पर्यटकांकडून काही मिळणारी बक्षिसी यावर त्याचा संसार चालू आहे. मी विचार केला की बाहेर एवढी बेकारी आहे व सुशिक्षित लोकही रोजंदारीप्रमाणे काम करत आहेत. पण हा माणूस आपल्या कौशल्याला धरून व सहज शिक्षणाने अजून प्रभावी काम करत आहे. शेवटी शिक्षण कोणतेही, अगदी सहज शिक्षणही प्रामाणिकपणे आपल्या व्यवसायात वापरले तर त्याचा नक्कीच परिणाम होतो.
उत्तम पिंगळे